पहिल्यांदा ती कुठे दिसली या पेक्षा कुठे भेटली हे महत्वाचं, पण नाही आठवत ते ही आता. पण अशीच कधीतरी दिसली आणि तेव्हा पासून ओळखीची वाटत होती ती. आम्ही दोघांनीही नाही विचारल एकमेकांच नाव, ती तिच्या विश्वात गुंग असायची. पण या गर्दीच्या जगात आमची नजर ओळख होती कधी तरी घाई-घाई त एकमेकांकडे बघून स्मित हास्य व्हायचं. तसे आमचे काही कॉमन मित्रही होते त्यामुळे कुणाचा तरी मित्र समजून ती ओळख देत असावी.
नंतरच्या काळात माझं तिच्या अवतीभवती असणं कमीच झालं, फक्त कधी तरी दुरून येता जाता हाय, हलो तेवढच व्हायच आमच्या संवादातले हेच दोन शब्द फार महत्वाचे होते, कधी येताना दिसलो तर हाय, आणि जातांनी बाय. आमची अशी ओळख झाली नव्हतीच पण संवाद चालू झाला होता. पण दोघ ही अनोळखी होतो एकमेकांबद्दल. पण इतक्या दिवसा पासून ओळख दाखवत होतो. आता अचानक नाव कसं विचारायचं असं तिच्या ही चेहऱ्यावरून त्या दिवशी जाणवलं. नाव न विचारताच आम्ही निघालो. आणि काही नात्यासाठी खरच नावाची गरज नसते, एकमेकांच नाव न विचारता ही ओळख झालीच होती कधी बोललोच तर चार दोन संवाद व्हायचे, आणि नेहमीच आम्ही कामात असतानी भेटायचो. एकदा तिच्या समोरच एक मित्राने आवाज दिला त्यामुळे कदाचित तिला माझ नाव कळाल असाव पण अशीही आमची मैत्री झालीच होती. मला नव्हतच माहिती करून घ्यायचं तीच नाव. नाव कळालं पण तिच्या नावासमोर असलेल जग मात्र शेवटपर्यंत अनामिकच राहील. खरतर ती दरी मीच ठेवली होती कारण नावावरून तयार होणार चित्र परत तिच्या बाबतीत तरी मला बघायचं नव्हत. हे सगळंच काल्पनिक वाटायचं पण मला ही हे असंच हव होत.
तीच उर्वरित जग माझ्यासाठी अनोळखी असलं तरी ती मात्र अनोळखी नक्कीच नव्हती, नेहमीच तर पहात येत होतो तिला. थोडंस दचकून का होईना पण ती बिनधास्त असल्या सारखी वागायची, बहुधा लाल आणि काळा रंग आवडत असावा तिला. तीच वावरणं मी मुद्दामहून नाही पण असच ओझरत टिपत आलोय. तिला बघून मी हरवून ही गेलोय कधी काळी अस्तित्वात असलेल्या जगात. पण त्यात ही ती कुठेच नव्हती. असे वेगळे झालेले जग इतक्या सहज कल्पनेतही जुळत नाही.जुळवून तरी काय करायचं होत?
आमच्या नात्यातली उत्सुकता अजून शिल्लक होतीच, संवादात एक अनामिक भीती असायची, दोघ ही एकमेकासमोर आलो की काहीतरी बदलल्यासारखं वाटायचं. या अनामिक दरीत आम्ही कधी ही डोकावून पहायचा प्रयत्न केला नाही. मला ही दरी मिटवायची ही नव्हती.
शेवटी ज्यावेळी तिला बघितलं त्या वेळी ती फार नटून आलेली होती. तिला समोरून येताना बघून जरा कपडे बरोबर केले, हाताने डोक्यावरचे केस नीट केले, आणि तिला बोलायला लागलो आज फार छान दिसतेस असं म्हणत मीच बोललो, ती ही खूप आनंदी असल्यासारखं बोलत होती, भेटूयात परत असं म्हणून आम्ही निघालो. पण ती आमची शेवटची भेट.
कोण होती ती? आणि मी का अस वागत होतो, मी मुद्दामच नव्हतो माहिती करून घेत तीच ना? व्यक्ती म्हणून तिला चिकटलेल्या असंख्य बाबी... कारण ह्या गोष्टी निर्माण करतात त्या व्यक्तीच्या प्रतिमा. कधी काळी मला नाही स्वीकारता आल्या ह्या सगळ्याच प्रतिमा आणि एक व्यक्ती म्हणून ती हरवत गेली माझ्यापासून. तिच्या इतक नक्कीच काही महत्वाचं नव्हत. काही पोकळ्या मी मुद्दाम हूनच ठेवल्या होत्या.
एकाकीपण जगायला शिकवतं.
ती फक्त तिचं एक प्रतीक रूप होती म्हणून मी ओळख निर्माण केली होती. तिला न स्वीकारता आल्याची खंत इतक्यात भरूनही काढायची नव्हती. ती जात होती तेव्हा मी तिला फक्त पाहत राहिलो. पण तिच्या जागेवर मी दुसऱ्याच कुणाला तरी पाहत आलोय आजवर. संवादाचे माध्यम अजून ही शिल्लक होतेच पण आता बराच उशीर झाला होता. बराच रस्ता कापल्या गेला होता आणि इतक्या सहज मागे वळताही येत नाही.
रूपक आणि सत्य दोन्ही वेगळे असतात आणि ते तसेच स्वीकारायला हवेत.
-राम जिरवणकर
No comments:
Post a Comment