Monday, 8 June 2015

ती

      पहिल्यांदा ती कुठे दिसली या पेक्षा कुठे भेटली हे महत्वाचं, पण नाही आठवत ते ही आता. पण अशीच कधीतरी दिसली आणि तेव्हा पासून ओळखीची वाटत होती ती. आम्ही दोघांनीही नाही विचारल एकमेकांच नाव, ती तिच्या विश्वात गुंग असायची. पण या गर्दीच्या जगात आमची नजर ओळख होती कधी तरी घाई-घाई त एकमेकांकडे बघून स्मित हास्य व्हायचं. तसे आमचे काही कॉमन मित्रही होते त्यामुळे कुणाचा तरी मित्र समजून ती ओळख देत असावी.
नंतरच्या काळात माझं तिच्या अवतीभवती असणं कमीच झालं, फक्त कधी तरी दुरून येता जाता हाय, हलो तेवढच व्हायच आमच्या संवादातले हेच दोन शब्द फार महत्वाचे होते, कधी येताना दिसलो तर हाय, आणि जातांनी बाय. आमची अशी ओळख झाली नव्हतीच पण संवाद चालू झाला होता. पण दोघ ही अनोळखी होतो एकमेकांबद्दल. पण इतक्या दिवसा पासून  ओळख दाखवत होतो. आता अचानक नाव कसं विचारायचं असं तिच्या ही चेहऱ्यावरून त्या दिवशी जाणवलं. नाव न विचारताच आम्ही निघालो. आणि काही नात्यासाठी खरच नावाची गरज नसते, एकमेकांच नाव न विचारता ही ओळख झालीच होती कधी बोललोच तर चार दोन संवाद व्हायचे, आणि नेहमीच आम्ही कामात असतानी भेटायचो. एकदा तिच्या समोरच एक मित्राने आवाज दिला त्यामुळे कदाचित तिला माझ नाव कळाल असाव पण अशीही आमची मैत्री झालीच होती. मला नव्हतच माहिती करून घ्यायचं तीच नाव. नाव कळालं पण तिच्या नावासमोर असलेल जग मात्र शेवटपर्यंत अनामिकच राहील. खरतर ती दरी मीच ठेवली होती कारण नावावरून तयार होणार चित्र परत तिच्या बाबतीत तरी मला बघायचं नव्हत. हे सगळंच काल्पनिक वाटायचं पण मला ही हे असंच हव होत.
तीच उर्वरित जग माझ्यासाठी अनोळखी असलं तरी ती मात्र अनोळखी नक्कीच नव्हती, नेहमीच तर पहात येत होतो तिला. थोडंस दचकून का होईना पण ती बिनधास्त असल्या सारखी वागायची, बहुधा लाल आणि काळा रंग आवडत असावा तिला. तीच वावरणं मी मुद्दामहून नाही पण असच ओझरत टिपत आलोय. तिला बघून मी हरवून ही गेलोय कधी काळी अस्तित्वात असलेल्या जगात. पण त्यात ही ती कुठेच नव्हती. असे वेगळे झालेले जग इतक्या सहज कल्पनेतही जुळत नाही.जुळवून तरी काय करायचं होत?
 आमच्या नात्यातली उत्सुकता अजून शिल्लक होतीच, संवादात एक अनामिक भीती असायची, दोघ ही एकमेकासमोर आलो की काहीतरी बदलल्यासारखं वाटायचं. या अनामिक दरीत आम्ही कधी ही डोकावून पहायचा प्रयत्न केला नाही. मला ही दरी मिटवायची ही नव्हती.
शेवटी ज्यावेळी तिला बघितलं त्या वेळी ती फार नटून आलेली होती. तिला समोरून येताना बघून जरा कपडे बरोबर केले, हाताने डोक्यावरचे केस नीट केले, आणि तिला बोलायला लागलो आज फार छान दिसतेस असं म्हणत मीच बोललो, ती ही खूप आनंदी असल्यासारखं बोलत होती, भेटूयात परत असं म्हणून आम्ही निघालो. पण ती आमची शेवटची भेट. 
कोण होती ती? आणि मी का अस वागत होतो, मी मुद्दामच नव्हतो माहिती करून घेत तीच ना? व्यक्ती म्हणून तिला चिकटलेल्या असंख्य बाबी... कारण ह्या  गोष्टी निर्माण करतात त्या व्यक्तीच्या प्रतिमा. कधी काळी मला नाही स्वीकारता आल्या ह्या सगळ्याच प्रतिमा आणि एक व्यक्ती म्हणून ती हरवत गेली माझ्यापासून. तिच्या इतक नक्कीच काही महत्वाचं नव्हत. काही पोकळ्या मी मुद्दाम हूनच ठेवल्या होत्या.
 एकाकीपण जगायला शिकवतं. 
ती फक्त तिचं एक प्रतीक रूप होती म्हणून मी ओळख निर्माण केली होती. तिला न स्वीकारता आल्याची खंत इतक्यात भरूनही काढायची नव्हती.  ती जात होती तेव्हा मी तिला फक्त पाहत राहिलो. पण तिच्या जागेवर मी दुसऱ्याच कुणाला तरी पाहत आलोय आजवर. संवादाचे माध्यम अजून ही शिल्लक होतेच पण आता बराच उशीर झाला होता.  बराच रस्ता कापल्या गेला होता आणि इतक्या सहज मागे वळताही येत नाही. 
रूपक आणि सत्य दोन्ही वेगळे असतात आणि ते तसेच स्वीकारायला हवेत.
-राम जिरवणकर 


Friday, 3 April 2015

अकरावे पत्र



मूळ गुजराती लेखिका : हिमांशी शेलत                                                                   
अनुवाद: सुषमा लेले 

                                                                                                                                 
संबोधनाशिवायचे हे पत्र बाजूला सारू नका, प्लीज. जरा मोठं असलं तरी धीर धरून वाचा. तुम्हाला लिहिते लिहिते म्हणत पूर्ण तीन वर्षं मी वाया घालवली आहेत. किती पंचावन्नच्या असाल नाही का तुम्ही ? मी तर तुमच्याहून जवळ जवळ बारा एक वर्षांनी  मोठी आहे . आत्ता दोन वर्षांनी सदुसष्ट पूर्ण होतील मला. त्याआधी हे पत्र तुम्हाला पोहोचवायचं असा दृढ निश्चय केलाय मी. रात्रीचे साडेअकरा वाजलेत आणि तशी माझी निजायची वेळ केव्हाच टळली आहे. आज एवढ पूर्ण करूनच निजेन म्हणतेय.
तुम्ही मला ओळखता. प्रत्यक्ष आणि नावानेसुद्धा. आपण पहिल्यांदा त्रिलोकजींकडे भेटलो होतो, आठवतंय ? मी त्यावेळी त्यांच्या स्टडीरूम मध्येच होते आणि तुम्ही आलात. खुपच छान दिसत होतात तुम्ही तेव्हा.  तुमचं तिथे येण्याचं प्रयोजन काय होतं ते आता माझ्या नीटसं लक्षात नाहीये, पण इतकं नक्की आठवतंय कि तुम्ही त्यावेळी खूप आत्मविश्वासानं बोलत होतात आणि हो, त्रिलोकजींच्या  भारदस्त व्यक्तिमत्वाने  दडपून न जाता अगदी सहजपणे वागत बोलत होतात.  आपला चष्मा टेबलावर काढून ठेवीत त्रिलोकजींनी ज्या रीतीनं तुमच्याकडे पाहिलं त्याच क्षणी माझ्या हृदयाचा ठोका चुकला.  माझ्या लागलीच लक्षात आलं की  हा गृहस्थ आता खात्रीनं तुमच्या निकट पोहोचणार. अगदी शंभर टक्के खात्री होती मला त्याची. 
तुम्ही तर हात जोडून लगेच उठलात. त्यापूर्वी त्रिलोकजींनी  आपल्या दोघींची ओळख करून दिली होती. तसं पाहिलं तर मला अस्वस्थ होण्याची काहीच आवश्यकता नव्हती. तरी मला  थोडं बावचळल्यासारखं झालं होतं. त्रिलोकजींच्या तोंडचं एक वाक्य कदाचित याला जबाबदार असावं, " गोल्ड मेडलिस्ट आहे बरं का...थोड्याथोडक्या नाहीत चांगल्या सात भाषा अवगत आहेत." 
'असतील...ठीक आहे, त्यात काय मोठंसं ?' असा विचार मनात आणायचा मी प्रयत्न केला.  पण खरं सांगायचं तर तसं करण्याचा माझा प्रयत्न अगदी फोल ठरला हे मात्र मी तुमच्यापाशी आत्ता कबूल करतेय. त्यानंतर जे काही घडत गेलं ते आपण दोघीही नीट जाणतोच आहोत. त्रिलोकजींच्या व्यक्तिमत्वानं भारावून जाणे हे तुमच्यासारखीला जडच होतं.  अशक्यच  म्हणूया. आणि हे  असंच कित्येक वर्षांपासून घडत आलं होतं. माझ्या बाबतीत त्रिलोकजींनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं होतं कुणास ठाऊक? माझ्या कौटुंबिक अडचणींमध्ये त्यांनी मला खूप मदत केली आहे असं सांगितलं असणार किंवा असंही सांगितलं असावं की माझे वडील त्यांचे स्नेही असल्याने ह्या शहरात माझी जवाबदारी त्यांनी आपल्या माथी घेतली आहे. आणखी एक शक्यता आहे - ते म्हणाले असावेत की  मी त्यांची एक जवळची मैत्रीण आहे... जे असेल ते  असो. त्यांनी त्यावेळी  जे काही सांगितलं ते तुम्ही मान्य केला असावं, नाहीतर असंसुद्धा असू शकतं की त्यांच्याबद्दल तुम्हांला वाटणारी ओढ इतकी उत्कट होती की माझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तुम्हांला अगदी गौण, झटकून टाकण्यासारख्या वाटल्या असतील. याला कारण अर्थात त्याचं व्यक्तिमत्त्वच.
अगदी खरं सांगयचं तर त्रिलोकजी हळूहळू तुमच्या सानिध्यात येताहेत हे पाहून मला खूप राग आला होता. पण तो राग काही काळच टिकला. नंतर मनात उरला तो  फक्त वात्सल्य भावच. मी मोठी नव्हते का तुमच्याहून ? मला समजून घेण्यात गल्लत करू नका. हे बोल गुरुता ग्रंथींनी ग्रासलेल्या व्यक्तीचे नाहीयेत. मी किनई अगदी सामान्य आहे. आकाशात उडू शकीन इतकी माझी सिद्धी नाहीये आणि तशी महत्त्वाकांक्षाही नाहीये. शिकता आलं तितकं शिकले आणि नंतर संशोधन कार्यात शिरले. तिथे सुरुवातीलाच त्रिलोकजी भेटले. त्यामुळे माझी कारकिर्दी त्यांनी घडवली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. त्या काळात कदाचित माझ्या चष्मा घातलेल्या बदामी डोळ्यांनी  त्रिलोकजींना भुरळ घातली असावी. मी स्वतः म्हणाल तर त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेने आणि शतकपूर्ण आवाजात आपली तर्कशुद्ध मते अगदी ठासून मांडणारा हा माणूस मला विलक्षण वाटत असे. एखाद्या युग पुरूषाहून तसूभर देखील कमी नाही. त्यांच्या हातून नक्कीच काहीतरी भव्यदिव्य घडणार आहे याची मला अगदी गळ्यापर्यंत खात्री होती. अशा पुरुषाच्या सानिध्यात राहण्याची मोहिनी मी तुम्हला वर्णन करून कशला सांगायला हवी? तुम्हांला माहीतच आहे की ती!  त्यामुळे त्यावेळी मी जे काही अनुभवलं त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटायचं कारणच नाही.
तुम्ही आलात आणि त्रिलोकजींच्या जीवनावर जणू काही स्वार होऊन गेलात. त्यावेळीसुद्धा त्यांच्यातील  सद्सदविवेकबुद्धीने  ठरविक उंची गाठली होतीच. बोलण्यातील ऋजुता, मदत करण्यातील तत्परता, सहृदयता..सगळं अगदी जसच्या तसं अगदी साचेबंद होतं. कुणाला काही तक्रार करायला संधीच मिळायची  नाही इतकं काटेकोर वर्तन. असं असूनही कित्येकदा मला दूर सारून दिल्यासारखं , झिडकारल्यासारखं वाटायचं. वरून मात्र कुणाला तसं दिसत नसे. मी पूर्वीसारखीच  त्रिलोकजींकडे  जात येत राहिले. जणू काही घडलंचं नसावं अशी. तुम्हांला आठवतंय? विसावं शतक पूर्ण होणार म्हणून एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्रिलोकजींनीच सगळं आयोजन केलं होतं. ह्या प्रसंगानिमित्ते जी स्मरणिका प्रकाशित करण्याचं ठरलं होतं, ते काम माझ्यावर सोपवण्यात आलं  होतं. तिकडे त्रिलोकजी तुम्हांला घेऊन फिरत होते... कधी एखाद्या उद्योगपतींच्या संकुलात, तर कधी कुणा वर्तमानपत्राच्या संपादकाकडे. एक दोनदा तर शहरापासून दूर असणाऱ्या फार्म हाऊसला देखील तुम्ही त्यांच्यासोबत जाउन आला होतात. अर्थात ही सगळी धावपळ कामानिमित्तच चालली आहे वगैरे दर्शवण्याचा त्रिलोकजींचा मरणप्राय प्रयत्न चालू होता. बिचारे त्रीलोक्जी! मुळात तुमच्या सानिध्यात राहण्याचा तो आटोकाट प्रयत्न होता हे त्यावेळी तुमच्याही लक्षात आलंचं असणार नाही का?
मला त्यावेळी असूया वाटत नव्हती असं खोटं मी मुळीच बोलायची नाही. अक्षरशः जीव पोळत होतं माझा. पण  त्रिलोकजींच्या स्वभावातली खुबी मला ठाउक होती. मी तसा विरोध  वगैरे प्रकट केला असता ना , तर जे करू नये ते करायलाही त्यांनी मागेपुढे पहिले नसते. म्हणून मग मी गप्पच राहिले. माझ्या चेहेऱ्यावरील प्रसन्नता तसुभरदेखील कमी होणार नाही याची जिवापाड काळजी घेत राहिले.  अतृप्तीची, नापसंतीची पुसटशी रेखाही दिसू दिली नव्हती तोंडावर. अभिनय उत्तम वठवत होते मी! शिवाय दुःखी होण्याने माझ्या अहंकारालाही तडा गेला असता...
त्यावेळी  पत्नीसुद्धा राहात होती घरात. तुम्ही भेटलाच असाल तिलाही. पुढे ती वारली. हृदयरोगाचा जोरदार झटका आला होता तिला. आपली सेवा-चाकरी किंवा काळजी यापैकी काहीच तिने त्रिलोकजींच्या  वाटयाला येऊ दिले नाही. उलट त्रिलोकजींना तिनेच प्रेमानं सांभाळलं होतं. त्यामुळे ती वारल्यानंतर त्यांना रितेपणा भासणं साहजिक होतं. त्यांच्या शोकमग्न अशा त्या दिवसांत तुम्ही त्रिलोकजींकडे  जास्त झुकत गेलात. मी त्या घरातील एक जवळची व्यक्ती म्हणून सगळं बघत राहिले फक्तं. तुमच्या सानिध्यात त्रिलोकजींचं दुःख हलकं होतं आहे हे सगळ्यांनीच मान्य केलं त्यावेळी. मीसुद्धा ते स्वीकारलं.
आता मी मूळ मुद्द्यावर येते. जे सांगण्यासाठी ह्या पत्राचा घाट घातला ती महत्त्वाची गोष्ट. त्रिलोकजी वारले त्याला चारेक महिने झाले असतील. त्यांच्या बहिणीने मला घरी बोलावलं. त्रिलोकजींचं सगळं अप्रकाशित साहित्य पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याचं त्यांचा बेत आहे. विशेष करून त्रिलोकजींनी जपून ठेवलेली  निरनिराळ्या लोकांची पत्रे. मोठमोठे नेते, कलाकार, देशोदेशींच्या प्रतिष्ठित व्यक्ती आणि स्वजनांची मिळून एक मोठी ट्रंक भरून  ही पत्रे आहेत. खरं वाटत नाही ना? त्रिलोकजी तसे अंगापिंडाने इतके धडधाकट आणि निरोगी  होते की मरणाचा विचार त्यांच्या मनाला शिवला देखील नसावा कधी. कारण हा माणूस इतका शिस्तबद्ध होता की निर्वाणीच्या व्यवस्थित सूचना दिल्यावाचून गेला नसता असा.

तर या ट्रंकेमधील  सगळी सामुग्री मला व्यवस्थित लावून त्यातील पत्रे निवडून, छाटून, आकडेवारीने लावायचं काम सोपवलं गेलं आहे. या पत्रांत बरीचशी खाजगी पत्रे देखील आहेत. पण  त्रिलोकजींची बहिण  मला परकं मानतच नाही ना! आता या कामाकरता त्यांनी तुम्हाला का बोलावलं नाही असा  विचार मनात आणून तुम्ही खिन्न -बिन्न  झालात तर त्यावर माझा काही इलाज नाही.
हं, या ट्रंकेमध्ये मला तुमची काही पत्रे सापडली आहेत, तशीच माझीसुद्धा आहेत. (त्यांच्या पत्नीचीही आहेत. ते बाहेरगावी गेले असताना लिहिलेली. आपण दोघींनी मात्र ते इथेच असून आपणही इथेच असताना लिहिलेली.) हो, चारेक पत्रे तुम्ही परदेशात गेला होतात त्यावेळी तिथून लिहिलेली आहेत हेही खरे. आता ही सगळी पत्रे नीटपणे वाचायची म्हणजे एक तपश्चर्याच म्हणा ना! त्रिलोकजींनी तुमच्या पत्रांना क्रम दिला आहे. प्रत्येक कव्हरवर लाल अक्षरात घातलेले क्रम आहेत आणि अशा अकराव्या पत्रात तुम्ही लिहिता आहात, "सु. बरोबरचे तुमचे संबंध शुद्ध मैत्रीचे आहेत, केवळ मैत्रीचे. त्यात स्त्री -पुरुषांत असणाऱ्या आकर्षणाचा लवलेशही नाही हे वाचून किती रोमांचित वाटले हे शब्दांत कसे लिहू? तुमच्या या संबंधांमुळे तुम्ही किती निंदा ओढवून घेतली आहे ते मला ठाऊक आहे. तेजोद्वेषाने पछाडलेल्या लोकांनी तुम्हाला दोष देण्यात मागे वळून पाहण्याचीही तसदी घेतलेली नाही. असं असूनही तुम्ही डगमगला नाहीत हे विशेष. प्रतिष्ठा पणाला लावून तुम्ही तुमची मैत्री जपलीत आणि विशेष म्हणजे त्या मैत्रीकडे आदराने पाहिले. तुमचे नैतिक धैर्य आणि पारदर्शी वर्तन पाहून माझ्या मनात इतकी उत्कट...'
बस्स! आपल्याला जे आत्ता हवं आहे ते इतकंच. बाकीची तुमची बिरुदावली खूप लांबलचक आहे . तिच्याशी मला कर्तव्य नाही, ती जागच्या जागीच राहो. मृत्यू  पावलेल्या प्रिय व्यक्तीबद्दल काही खोटंनाटं सांगायचं हा माझ्या दृष्टीनं अक्षम्य अपराध आहे. मी जे काही सांगणार आहे ते खरं असून त्याचा स्वीकार करा आणि त्यात जर कुठे शंका वाटत असली तर सरळ माझ्याकडे या. माझ्या खरेपणाची साक्ष देणारी त्रिलोकजींनी मला लिहिलेली पत्रे माझ्याजवळ आहेतच, केव्हाही येऊन ती तुम्ही वाचू शकता. 
मी आता जो कबुलीजवाब देणार आहे तो ऐकण्यासाठी मन घट्ट करा. त्रिलोकजींचे आणि माझे सगळ्या प्रकारचे संबंध होते. आम्ही अगदी संपूर्ण संसारसुख उपभोगलं आहे असंच म्हणा ना. त्यांच्या पत्नीपासूनसुद्धा आम्ही आमचे संबंध लपवलेले नव्हते. तुम्हांला त्यांनी काय सांगितले असेल याची मी कल्पना करू शकते;  पण असं का सांगितलं असावं ते मात्र माझ्या आकलनाच्या बाहेरचं आहे. खरं तर  त्रिलोकजी दांभिक वगैरे मुळीच नव्हते. माझ्याबरोबरच्या त्यांच्या संबंधांमुळे तुम्ही कदाचित त्यांच्या तितक्या निकट येऊ शकला नसतात अशी त्यांना भीती वाटत असावी आणि तुमच्याबद्दल त्यांना अतोनात... असो, जाऊ द्या.  असल्या तर्क-कुतर्कांना काही अर्थ नाही.  आपल्याला फक्त सत्य काय आहे त्याच्याशीच कर्तव्य आहे.
तुम्ही मला विचाराल की हे सगळं तुम्ही मला पूर्वीच  का बरं सांगितलं नाही... पण नव्हतं सांगायचं मला ते. ज्या पुरूषावर आपलं अगदी मनापासून प्रेम असतं ना, त्याला लज्जित व्हावं लागावं असं काही माझ्या तोंडून सांगायची माझी मुळीच इच्छा नव्हती. आज त्रिलोकजी हयात नाहीत तेव्हा स्पष्टीकरण देण्यास काहीच हरकत नाही. माझी खात्री आहे की  इतकं स्पष्टपणे सगळं कबूल केल्यानंतरही तुमच्या त्यांच्याबद्दलच्या प्रेमाला मुळीच ओहोटी लागायची नाही. ते पूर्ण पुरुष म्हणून जगू शकलेले एक अत्यंत प्रेमळ आणि सहृदय गृहस्थ होते. मर्यादापुरुषोत्तम असल्याचा दावा त्यांनी तरी कुठे केला होता कधी?  मग आपण का म्हणून त्यांच्या माथी दोष थापायचा उगाच?

तरीही मला आपलं वाटलं की त्यांना तुम्ही नीट जाणून घेणे आवश्यक आहे, ते जसे होते  त्याच स्वरुपात. कुठलाही कृत्रिम मुलामा किंवा वर्ख चढवलेल्या रुपात नाही. तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं असल्याने त्यांना पूर्णपणे जाणून घ्यायचा तुम्हांला अधिकार आहे. ज्याला सर्वस्व समर्पित केलं त्या पुरुषाला जाणण्याच्या स्त्रीच्या हक्काची मी आठवण करून देतेय. मी त्रिलोकजींना नीट त्यांच्या खुद्द पत्नीकडून नीट समजून उमजून  घेतलं होतं, अगदी तसंच तुम्हीही... आणि हो त्यांचा तर प्रेमविवाह होता. घरून पळून जाऊन , नातेवाईकांचा  विरोध असताना मित्रांच्या मदतीनं केलेलं लग्न. माहीत नसेल कदाचित तुम्हांला. सांगितलं होतं का हो त्यांनी तुम्हांला कधी याबाबतीत? 
मुळातच त्यांचं हृदय शिगोशिग प्रेमानं भरलेलं होतं. सगळ्यांनाच वाटायचं की हे माझ्या अगदी निकटचे आहेत अगदी... एखाद्या स्त्रीवर प्रेम करून रंक होऊन जाणाऱ्यांपैकी ते नव्हतेच. चहुकडे उधळून टाकल्यानंतरही त्यांच्या हृदयाचं प्रेमपात्र शिगोशिग भरून वाहात राहिलं.

यापूर्वी मी लिहिलंच आहे त्यानुसार तुम्हांला हे सगळं जर नापसंत वाटत असेल आणि स्वीकार्य नसेल  तर तुम्ही त्यांनी मला लिहिलेली पत्र वाचून पहा; मी ती अजूनही जपून ठेवली आहेत. तुमची सगळी पत्रे तुम्हांला परत करायची माझी इच्छा आहे. माझी पत्रे मी जाळून टाकणार आहे. मग या ट्रंकेमधील बाकीची पत्रे होईनात का प्रकाशित! माझी काहीच हरकत नाही त्याला. आपली दोघींची पत्रे मात्र प्रकाशित होण्यासाठी लिहिली गेली नाहीयेत. मला वाटतं ती राख होण्यासाठीच लिहिली गेली होती. आपल्याला कुठे हे माहीत होतं नाही का? 
मला मनापासून वाटतं आहे की माझा हा निर्णय तुम्हांला पटावा असाच आहे. कोण्या हळव्या मनाच्या व्यक्तीने आपली पत्रे वाचली तर एका उमद्या माणसाबद्दल नाहक गैरसमज पसरतील. काही खालच्या पातळीवरचे लोक त्रिलोकजीसुद्धा आपल्याच जातीचे होते असं म्हणून कुत्सितपणे हसतील. तर काही निंदक या नाजूक बातमीला सर्वत्र पसरवून त्यांची बदफैली करून जल्लोष साजरा करायलाही कमी करणार नाहीत. आपल्या संबंधातील ऋजुता, सूक्ष्मता आणि वास्तविकता कुणालाही समजण्यासारखी नाही. अगदी अशक्य आहे ते. त्रिलोकजींबद्दल आपल्याला जे वाटायचं त्याच्याशी इतरांचं काहीच देणं घेणं नाही. त्यामुळेच बहुधा असूया मला स्पर्शदेखील करू शकली नाही असं मला वाटतं. तुमचंही कदाचित तसंच असण्याची शक्यता आहे. जे प्रेम कधी बंधनकारक वाटलं नव्हतं ते नक्कीच एका विशिष्टं उंचीवर पोहोचलेलं होतं. सगळे काही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्रिलोकजींची ओजस्वी मूर्ती अस्पष्ट, धूसर होणं आपल्याला कसं बरं परवडेल? 
मग  आता  मी  आपली सगळी पत्रे ट्रंकेतून काढून घेते, ठीक आहे ना? तुमची पत्रे न्यायला तुम्ही याल ना? खरंच तुम्ही आलात तर दोघींची भेट होईल आणि छान गप्पाही होतील. अशा गप्पा ज्या आपल्या दोघींतच संभवू शकतात. तुमची वाट पाहतेय हं मी...येणार ना मग?
आपली विश्वासू ,
नावाची आता गरज उरली आहे का?

टेलिफोननं दिलेलं जीवदान

कथा- जिरो अकागवा,अनुवाद- निस्सिम बेडेकर
चुकीच्या नंबरवरून टेलिफोन येणं ही खरोखर डोक्याला वैताग आणणारी गोष्ट आहे. राँग नंबरवरून फोन आल्यानं खूष होणारी व्यक्ती या जगात अस्तित्वात नसेल. पण त्यामुळे केवळ कटकटच होते आणि फायदा कधीच  होत नाही असं म्हणावं तर तसंही नाही. आता मला तसं का वाटतं हे जरा सांगायला हवं. त्या वेळी मी एका पार रिकाम्या, वापरात नसलेल्या एका खोलीत एका खुर्चीवर बसलो होतो. ती खुर्चीसुद्धा कधीच बसू नये वाटावं अशी. बाहेर जाणंही मला शक्य नव्हतं. कारण माझ्यापासून जेमतेम तीन मीटरवर पिस्तुलाची एक नळी जणू  आ वासून माझ्यावर नजर ठेवून होती. माझ्यावरच रोखलेली होती ती. ते पिस्तुल ज्याच्या हातात होतं, तो होता एक पोरगेलासा मामुली गुंड. त्याचं नाव होतं 'कात्सुजी', पण सगळे त्याला 'कात्सु ' म्हणूनच ओळखायचे. त्याच्या बाजूलाच एक लाकडी टेबल होतं, आणि टेबलावर टेलिफोन होता. गेला अर्धा तास आम्ही दोघं एकमेकांशी एक शब्दही न बोलता वाट बघत होतो-फोनची. माझं जगनं किंवा मरनं आता त्या फोनवर अवलंबून होतं.   या खोलीतून जाताना कात्सुच्या बॉसनं-अंगापिंडानं चांगला धिप्पाड गडी होता तो-त्याला बजावलं होतं. "कात्सु, नीट ऐक. याला बिलकुल निसटू देऊ नको, कळलं? करडी नजर ठेव साल्यावर. मी जरा मोठ्या बॉसशी बोलून घेतो, याचं काय करायचं ते. काय ते ठरलं की इथे फोन करून तुला सांगतो. "त्सुदोन!! एक दे गोळी साल्याच्या मेंदूत!" असं म्हटलं, की ताबडतोब दाब घोडा पिस्तुलाचा! ठीक?" कात्सुनं होकारार्थी मान डोलावली. त्याचा चेहरा चांगलाच ताणलेला होता.    तर अशा प्रकारे आम्ही 'निर्णया'ची वाट बघत होतो. पण मी तसा शांत होतो. आमच्या गान्गच्या पैशांची व्यवस्था बघण्याचं काम माझ्याकडे होतं, आणि मी त्यातल्या बऱ्याच पैशांवर डल्ला मारला होता. ती गोष्ट आता उघडकीला आली होती, त्यामुळे आता हाच आपला शेवट असं समजून मी जगण्याची आशा सोडून दिली होती. भेदरलेला होता तो कात्सु. अर्थात त्यात वावगं काहीच नव्हतं म्हणा. आधीच तो होता कोवळा पोरगा, त्यात त्यानं अजून कुणाला उडवलंसुद्धा नव्हतं. त्याची बोबडीच वळली होती. मी त्याला विचारलं, सिगरेट ओढू का म्हणून. तर तेवढ्यानंही तो किंचाळला, "हलू नको! गोळी घालीन नाहीतर!" मी खांदे उडवले आणि तो नाद सोडून दिला.
तेवढ्यात टेलिफोन खणखणला.   एखाद्यानं थप्पड मारावी तसा कात्सु एकदम दचकला आणि काही वेळ वाजणाऱ्या फोनकडे तसाच बघत बसला. "अरे फोन घे की गध्ध्या लवकर!" असं मी म्हणताच त्यानं एकदम झडप घालून रिसिव्हर उचलला. " हलो...काय? दोन वाडगे नूडल्स?....मस्करी करतोस होय? कुठेही फोन करतो हरामखोर!" मी स्वतःशीच हसलो. ही खोली म्हणजे माझं गुप्त ऑफिस होतं, पण या फोनचा नंबर आणि कुठल्यातरी नूडल्सच्या हॉटेलचा नंबर बराचसा सारखा होता. त्यामुळे बऱ्याचदा या फोनवर गिऱ्हाइकांचे चुकून फोन यायचे. पुन्हा एकदा पंधरा मिनिटांची जीवघेणी शांतता. त्याचं दडपण आणि वैताग अधिकाधिक वाढत होता की काय, त्याचा चेहरा अक्षरशः पांढराफटक पडला होता. पुन्हा एकदा फोन. "हलो-- काय?...'ओयाकोदोन' एक?...अरे हे काय नूडल्सचं हॉटेल नाहीये!!" त्यानं दणकन रिसिव्हर आपटला. आता त्याच्या चेहऱ्यावर घामाचे टपोरे बिंदू  जमले होते. "काय रे पोरा, बरा आहेस ना?" मला आता खरच त्याची काळजी वाटायला लागली होती. "ए ! गप!" तो खेकसला. आता तो कुठल्याही क्षणी गोळी मारेल असं वाटत होतं. त्याच मिनिटाला टेलिफोन खणखणला.   "हलो....ठी..ठी...ठीक आहे!!" आला का एकदाचा त्याचा फोन. आता मी मरणाची तयारी केली. कात्सुनं रिसिव्हर ठेवला. "आला रे फोन! 'त्सुदोन! एक...' म्हणून!...हो...हो...तयार..."   पण काहीतरी विचित्रच घडलं. अचानक कन्ह्ल्यासारखा आवाज करून -जणू  हृदय पिळवटून निघत असावं तसा- कात्सु धाड्कन जमिनीवर कोसळला आणि तत्क्षणीच त्याची हालचाल बंद पडली. जवळ जाऊन बघावं तर...ठार मेला होता तो! मुळातच त्याचं हृदय कमकुवत असणार नक्की---तेवढ्यात पुन्हा एकदा फोन. रिसिव्हर उचलला, तर तो होता त्याच्या बॉसचा आवाज.   "कोण कात्सु का? बराच वेळ ताटकळत ठेवलं तुला. मोठा बॉस म्हणला, की मला स्वतःच्या डोळ्यांनी  त्या साल्याचे तुकडे तुकडे होताना बघायचंय. तर त्याला ये घेऊन इकडे. कळलं?" ----क्षणभर माझा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.
मग काही वेळापूर्वीचा कात्सुनं घेतलेला तो फोन होता तरी कुणाचा? तसाच आ वासून उभा होतो, तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजला. " ए मूर्खा! मघाशी कात्सुदोन एक असं म्हणालो, तर साधं नावही न विचारता फोन ठेवलास होय रे लेका! दोन नंबर विभागात राहतो मी. माझं नाव वातानाबे. काय कळलं?" मी हलकेच मान डोलावली. मामला असा होता तर!   ताणामुळे आणि दडपणामुळे 'कात्सुदोन एक' असं म्हटलेलं त्याला 'त्सुदोन! एक' असं ऐकू आलेलं असणार नक्की! मी नकळतच हसत सुटलो. जर...चेहराही कधी न पाहिलेल्या त्या कोणा वातानाबेनं 'कात्सुदोन' ऐवजी 'तेन्दोन'ची ऑर्डर दिली असती, तर माझं आयुष्य नक्कीच संपलं असतं. मग त्यानंतर? अर्थातच मी धूम ठोकली. म्हणूनच तर आज हे तुम्हाला सांगतोय मी..... आता कळलं का तुम्हाला, कधीकधी चुकून आलेला फोनही कसा उपयोगी पडतो ते?---फक्त एकाच रुखरुख लागून राहिलीये हो मनाला. माझा जीवनदाता असलेला तो कोण वातानाबे...बिचाऱ्याला कात्सुदोन काही खायला मिळालं नाही हो.
टीप:
कात्सुदोन:  वाडगा भरून भात आणि वर तळलेलं पोर्क कटलेट असा जपानी खाद्यप्रकार.
तेन्दोन : वाडगा भरून भात आणि वर तळलेले मासे व भाज्या असा जपानी खाद्यप्रकार.
त्सुदोन: ढिशांव! अशा अर्थाचा जपानी उद्गार.
कथा- जिरो अकागवा
अनुवाद- निस्सिम बेडेकर

सोंग




मनीषा साधू
 पावसाची रिपरिप सुरूच आहे. हा झडीचा पाऊस. थांबायचा नाही उद्यापर्यंत. रामश्यानं कांबळीतून डोकं बाहेर काढलं.अंधारल्या झोपडीत दिसण्यासारखं काहीच नव्हतं.त्यानं हात लांबवून चिमणीची वात मोठी केली. पण धुरकटल्या काचेत प्रकाशानं अंग चोरून घेतलं. त्यालाही या झोपडीचं दर्शन नको होतं जणू.रामश्यानं चुलीकडं पाहिलं. पहाटे पेटली होती ती.पार्वतीनं पहाटे भात रांधला होता.मीरची ठेचून,मीठ घालून तसच भांडं मधे ठेवलं तिनं.लेकरांनी हात घातला भांड्यात आणि पाठोपाठ रामश्यानं घातला संकोचत.भूक मंदावण्यापुरते घास लेकरांच्या पोटात गेल्याचा अंदाज आल्यावर त्यानं भांडं ओढलं मधून,अन पार्वतीकडे सरकवलं. ’पारोते, घे खाय!’ ‘खाऊ द्या लेकरान्ले’ म्हणतानाच तिनं ते स्वत:कडे ओढून बोटानं खरवडायला सुरुवात केली होती.ओटीच्या तांदूळाचा भात असल्यानं तांदूळ धूतले तरी लालसर,काळपट,केशरी असे पुजेचे सारे रंग घेऊन शिजायचा.कधी कणिक मिळालीच तर पानगे यायचे वाट्याला.मिळालं कहीही तरी सगळ्यांच्या पोटाला पुरत नाही.सगळे पोटभर जेवल्याचं कधी कोणालाच स्मरत नाही. पाऊस असाच सुरू ऱ्हायला तर उद्या जोगवा मागायला कसं फिरायचं या काळजीनं कपाळावर चोळत रामशानं झोपडीत नजर फिरवली.तिन्ही पोरं पोत्यावर अंथरलेल्या पिवळ्या प्लस्टिकच्या कागदावर वेडी-वाकडी झोपली होती.खोल गेलेल्या पोटावरचे हाडकुळे हात आणि वर आलेले मोठे टोंगळे अंधारातही उठून दिसत होते. ‘पारोते, भात हाय का शिल्लक पाय नं.’ ‘कुठून आसन वो?’ ‘पाह्यन वं,थे उपरनं हाय सोरत्याचं तिथं लटकवलेलं,थेच्यात पाय.’ ‘त्यांच काय पायी?’ ‘दिसतया कायतरी बांधलेलं’तो ताडकन उठला.सोरत्याचं उपरणं त्याच्याच खांद्यावर ऱ्हायलं काल.मुठभर काहीतरी बांधलेलं आहे त्यात.रामश्यानं सांभाळून गाठ सोडली.डोळे लकाकले.त्यात जवळपास दोन वाट्या ज्वारी होती. ’ह्ये पाय!’ तो ओरडल,अन गपकन स्वत:चं तोंड दाबलं.पार्वती उठून जवळ आली. ‘ऱ्हावू द्या,त्यांची हाय.वरडतील उद्या.’ ‘घे शिजव.’ ‘आवं ऱ्हावू द्या म्हनते ना.लेकरं झोपले आता.उठवलं तर कोनाचीच भूक भागायची न्हाई. ऱ्हावू द्या.निंघून जाईन रात्र.लागलं तर उठल्या उठल्या लेकरानलाच द्याव लागल खायला.’ ‘आत्ता शिजव माह्यासाठी!’धान्य दिसल्यावर रामश्याला भूक धरवेना.पार्वतीचा जीव गळला होता.तिला उठून काहीही करण्याची इच्छा नव्हती.दोन दिवसांपासून तिच्या पोटाला आधाराएवढंही अन्न मिळालं नव्हतं.पण पोरं झोपल्यानं दोघांनाही बरच खाता येईल या स्वार्थी विचारानं उठवलच तिला. ‘कन्या करती का काय?’ ‘मंग आता भाकरी थापत बसू का काय?’ ती रागानं म्हणाली.हलक्या हातानं तिनं ज्वारी रगडली.कण्या शिजवल्या.अन्नाच्या वासानं लहानग्यानं चुळबूळ केली.रामश्यानं त्याच्या पाठीवर हलकेच थोपटून त्याला परत निजवलं.आता मुलांनी अजिबात उठायला नको होतं त्याला. ‘पारोते,भावलाल म्हनला,पहाटे बरबटी रांधायली वैनी म्हनून,घिवून जाय बोल्ला मघा.आनती का जाऊन?’ ‘बरबटी? घिऊन जाय म्हनला?,आन मंगा का वो नाय सांगीतलं?लेकरानला घातलं आसतं वो खायला!’ती कळवळून म्हणाली. ‘तुह्या घरादाराले पुरल इतकं देनार हाय का कुनी?त्यानलेच पुरं पडंना. वाटीभर देत्याल.आन की कन्या सोबत खावू.’

पर्वतीला त्याच्या स्वर्थीपणाचा संताप आला.लहाना भिका मघा भुकेनं कळवळून रडला.कसाबसा झोपवला त्याला. ‘बाप हाय का काय?’ती घुम्म बसून राहिली. ‘जाय नं..’रामश्यानं कंबरेत ढोसलं तिला.एकदम कळ निघाली.चवथा लागलाय तिला हे माहित असूनही नसल्यासारखं चाललं आहे.तिलाही भूक धरवत नाही आताशात.पोटातलं पोरगं आपला वाटा मागतंच निर्दयपणे.ती उठली.कुडाच्या भिंतीवर एकाच खुंट्याला एकावर-एक लटकवलेल्या बहुरुप्यांच्या केसांचे टोप,मुंडासे,ओढण्या बाजूला करून तिनं निळं प्लास्टीक ओढलं.अंगावर ओढून घेत बाहेर पडली.वहीनीनं उसळ जास्त दिली तर पोरांना उठवून घास-घास द्यायची नाहीतर लहानग्या भिकाला खावू घालायची एकट्याला.आपल्याला काय,आजची रात्रही काढता येईलच.पाऊस थांबेल उद्यापर्यंत.उद्या मिळेलच काही ना काही. विचार करीतच ती भावलालच्या झोपडीपाशी आली. शे-दिडशे झोपड्यांचे गाव नाथजोग्यांचे.डवरी गोसावी,भराडी नावाने ओळखला जाणारा भटका समाज.नवनाथाचे भक्त.जोगी म्हणून वेशांतर करून जोगवा मागत फिरतात गावोगाव.उन्हाळ्यात चार महिने पोटापाण्यासाठी वणवण.तंट्याभिल,पोलीस,रामायणातील पात्र अशी विविध सोंगं घेऊन बहुरुपी म्हणून जोगवा मागणे हाच पोटापाण्याचा धंदा.आता या अवकाळी पावसानं पुढच्या काही महिन्यांची तजवीज कशी व्हावी समजेनासं झालय सगळ्यांना.घरात आताच अन्नाचा दाणा नाही.काही लोक निघून गेले तिकडे नागपूरकडे.भावलालची म्हातारी अन रामशाची दोन्ही लेकरं चिकनगुनियानं आजारी असल्यानं हे दोघं मागे राहिले.जवळपास भटकून जे काही मिळेल ते आणून आला दिवस काठत राहिले.कालच भावलालशी बोलला रामश्या, ‘लाल्या,आता नाही भागायचं गड्या.आता जाव लागंल आपल्यालेबी नागपूरकडं.लेकरं बरी हाय आता.म्हातारीचं काय म्हन्तू?’ ‘काय,म्हनाचं तरी काय आता.म्हनू नाई पन...मरत बी नाई म्हातारी.गौऱ्या गेल्या मसणात पन हे खटलं रिकामं करंना...जाऊ आपन,नाई मरायची ती माघारा.’ ‘दोघानच कसं गड्या? थे सुपडं हाय न गोदरीचं,थ्याले न्याचं?’ ‘थेची बाय गरोदर हाय.पहिलटकरीन हाय,यायचा थ्यो?’ ‘न यायला न काय झालं?लगीन झाल्यानं पोटं मरत न्हाय,उलट पोटं वाढती खानारी.येईल त्यो,विचार त्याले.’ ‘वैनी...’ पार्वतीनं लोटलेलं कुडाचं दार हळूच खडखडवलं. जोरात थाप दिली तर आत झोपलेल्या पोरांच्या अंगावर पडायचं. भावलालच्या बायकोनं डोकं बाहेर काढलं. ‘थे बरबटी देते म्हने यानले.’ ‘कोन?ह्ये म्हनले?’तिने डोके परत आत घातले.आतून दोघांचे एकमेकांवर ओरडण्याचे आवाज येऊ लागले. ‘पोटाला पुरना आन गावाले आवतन!’ ‘दे काहाडून थोडी.त्वा गिळली नव्हं दोनदा;मंग कायले कातावते?किलोभर आनली म्या.यका दमानं शिजीवली का काय?’ ‘म्या काढून ठिवली लेकरानसाठी.उद्या काई न्हाई मिळालं म्हन्जी?’काय हाडं देऊ माहीवाली चोखाले?’ ‘गप बैस! म्या बोलावलं त्यानले.दे पसाभर.’ भावलालचा आवाज चढला.आता ऐकणंच फायद्याचं नाहीतर मार बसेल हे ताडून तिनं नाईलाजानं वाडगंभर शिजवलेली उसळ आणली. ‘सुखीवाली बी दे.उद्याचं उद्या पाहू.’ तिनं भावलालच्या सुचनेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं अन घाईघाईने बाहेर हात अन डोकं काढलं.हे सगळं ऐकूनही पार्वतीचा हात वाडगं घ्यायला पुढे झालाच. पार्वती झोपडीत शिरली.अंगावरचं प्लास्टिक कोपऱ्यात टाकलं अन चुलीपाशी आली.तोवर अर्धवट शिजलेल्या कण्यांचा रामशानं फडशा पाडला होता. ‘माय वं माह्यासाठी नाय ठेवल्या?’ती वैतागली. ‘आन इकडं.’ त्यानं तिच्याकडून वाडगं हिसकावलं.चवताळलेल्या मांजरीसारखी ती फिस्कारली, ‘लाज हाय का जिवाले?समद्या खाऊन टाकल्या अन हे बी गिळताय? लेकरं उपाशी झोपले तरी बी. ह्ये म्या भिक्याले देनार आहो.’ ‘थे झोपला हाय तं उठवून खायला घालती. मी जागा हाय, भूक भडकलीये माजी; आन इकडे.’ ‘माहीवाली भूक नाही दिसत तुमाले.का मले भूकच देल्ली नाय देवानं? हे चवथं ठिवलं पोटात,त्याले काय दगड माती भरवू?’ तिनं त्याच्या हातून वाडगं परत हिसकलं.रामश्या संतापला.त्यानं उभी लात मारली तिच्या कंबरेत.ती वाडग्या सकट भिंतीवर आदळली.खुंट्यावर लटकलेलं सामान अंगावर पडलं.कोपऱ्यातले भांडे गडगडले.त्या आवाजानं मुलं उठून बसली.परत मारामारी सुरू होणार म्हणून एकमेकांना बिलगून आल्या प्रसंगासाठी तयार झाली.
रामश्यानं चुलीतलं लाकूड ओढलं अन पिसाळल्या सारखा पार्वतीला मारत सुटला.भुकेनं त्याच्या मेंदुचा ताबा पुरता मिळविला होता.ती गुरासारखं ओरडू लागली.बाजूच्या झोपडीतून बाया माणसं धवली.’आरं,गाभन आय ना...सोड मुडद्या.’ कुणीतरी मुलांना ओढून बाहेर नेलं .बापड्यांनी रामश्याला दाबून धरलं.अगतिकता अन संताप यानं रामश्या रात्रभर थरथरत होता.आणि ठणकणाऱ्या अंगानं पार्वती कण्हत पडली होती.पोरं परत भडकलेल्या भुकेला विसरायला बघत होते. पहाटे रामश्यानं निघण्याची तयारी केली.नीळ लावलेला भक्क निळसर गुरुशर्ट,धोतर अन पांढरी टोपी घातली.पार्वती तापानं कणकणली होती.त्यानं कण्हणाऱ्या पार्वतीच्या अंगावरून न बोलता हात फिरवला.डोळे पुसत उठला. ‘कवा येतायसा?’ तिनं क्षीण स्वरात विचारलं. ‘ध्यान ठीव स्वत:च अन लेकरायचं.चारेक दिवसातच काय मिळाल ते आनून देतो आधी.मग पुढं जाऊ,बाकिच्यानले गाठू...’ जरा थांबून म्हणाला, ’ऱ्हाईल नं?’ ‘का सांगू?’ नजर फिरवत पार्वती म्हणाली. ‘न ऱ्हाईल तं बरं आसं वाटू लागलंय आता.आहे त्याच पोटायला मिळंना,आनखी एकाचे शाप कायला?’ रामश्या झटक्यात उठला.झोपलेल्या मुलांकडे बघायचं टाळून अन मनात येणारे पुढचे सगळे विचार,काळज्या गिळत त्याने झोपडीबाहेर पाऊल टाकले. भिवालाल हापशीपाशी उभा होता.सोरत्या अन सुपड्या दोघेही भाऊ हातावर तंबाखू चोळत निघण्याच्या बेतात होते. ‘दोघंबी यायले का?’ ‘ह्वय.’ ‘माघारा वस्तीत कुणी गचकलं का न्यायले चार खांदे भी न्हाय मांगं .बायानं पोरच फकस्त.’तीघही खिदळले.या विनोदानं रामश्याच्या अंगावर काटा आला.चिकनगुनीयानं फणफणलेले दोघं अन पार्वती...’आसं वंगाळ नका बोलू गड्या.देविमाय कृपा कर व बयो! सांभाळून घे!’त्यानं हात जोडले,त्याच्या पाठोपाठ तीघांनीही. ‘सोरत्या, किंगरी घेतली काय तुहीवाली?सोरत्याची किंगरी वाजली अन सुपड्याचं भजन;का जमलं मंग!’ ‘सोरत्यानं साद्या घेतल्या हाय नेसाले’ ‘परत थे तशी सोंगं काय करायची ऑं? आपून आपली छान जुनी सोंगं करू .थू नारद व्हय.’ ‘नागपूर मोठंजात शहर होय.साडीवाले नाचले का दनादन पैसा टाकते लोकं.’ ‘आपून आपला धंदा कारावा.जुनं थेच सोनं आसतं म्हनत्यात.’ ‘कोन विचारेना जुन्याले.जमाना बदलला हाय.आपल्यालेबी बदलाव लागतंय..’ नागपूरला गेल्यावर काय वेशांतर करायचं यावर चर्चा करीत ते बसथांब्याकडं निघाले.
भावलालनं तिघांच्याही तिकीटाची सोय केली होती. तिथे उतरल्यावर नागपूरच्या एका वस्तीत ते पोहोचले.त्यांच्या समाजाची काही माणसे तिथे अगोदरच पोहोचली होती.नागपूरची ही एक जुनी वस्ती. सोयी सुविधांचा अभाव असलेली. एकाला एक लागून असलेली घरे.अरूंद गल्ल्या.रस्त्यावर उघड्या नाल्या.गारुडी,मदारी,वाघाची सोंगं घेऊन अंगावर चट्टेपट्टे रंगवून नाचणारी माणसे,तृतीयपंथी असे सगळेच हातावर पोट घेऊन फिरणारे या वस्तीत अधून मधून दिसायचे. टी.व्ही.चा प्रभाव इथेही जोर धरत होताच.तरीही लोककलेचा क्षीण धागा या वस्तीशी बांधलेला अजूनही कायम होता.नाथजोगी शहरातील अशा वस्त्या आणि अद्यापही उरलेली अशी भोळी माणसे शोधीत वण्वणत होती. ‘का म्हनता सावरावजी;कसं चाल्लंय?यायला उशीर झाला आमाले.’ ‘लवकर येऊन बी आमी काय केलं?यंदा काय ठीक नाई.लोकानले टीवी ची करमनूक भावती.आता सोंगं घेऊन पोटं भरंना झालं.’सावरावजी म्हणाला. ‘दुसरं करनार तरी काय मंग आता?कामं लागंना हाताला,भीक मांगनंच बाकी ऱ्हायलं.’भीवा बोलला. ‘गावाकडं समदं ठीक हाय न्हवं?’सावरावनं विचारलं. ‘ठीक आसतं तं आजारी मानसं टाकून दगडाच्या काळजानं येतं ना आम्ही.’रामश्या बोलला. ‘चला,उद्यापासून तुम्ही बी चला सोबतीला.तू कोन हुनार रे सोरत्या?’सावरावनं विचारलं. ‘सोरत्याकडं दोन साड्या हाय.सोरत्या,सुपड्या नेसायलेत. दोघं फिल्लमवाल्या बायाचं स्वांग घेतील.म्या नारद हुतो’रामश्यानं सांगीतलं. ‘दोन फिल्लमवाल्या बाया अन नारद?’सावराव हसला मोठ्यानं. ‘यडा की काय तू? हे कंच जुगाड? माह्यावाली यक साडी हाय.तू बी बाई बन.’ ‘न्हाय बा’ रामश्या बोलला, ’आपून न्हाई बाईचं स्वांग घेतलं कधी.’ ‘मंग घे की आता.बाया म्हनून आतपर्यंत घुसता येईल वस्तीत.मंग आत गेलं का जोगवा मांगू.तसं तं कोनी घुसूच देत न्हाईत आजकाल,का जाना गा काय झालं तं.’ रामश्या तयार झाला.दुसऱ्या दिवशी तिघेही साड्या नेसले.विग लावून तयार झाले.पान चावून ओठ लाल केले.निघतांना परत पावडर फासली तोंडावर.भिवालाल पुरुषाच्याच वेषात होता.वेळ पडली तर पुरुष गोटात मागता येईल म्हणून. सावराव म्हणाला,’तुम्ही तिघे या भागाकडं जावा.आम्ही काल गेल्तो तिकडेच जातो.काही गल्ल्या बाकी हायत.’ ‘इकडून कुनीकडे निंगायचं?’सोरत्यानं विचारलं. ‘या वस्तीतून निंगायले यकच रस्ता हाय.हा रस्ता ध्यानात ठीवजाल.आतमंदी चक्रव्युहच जनू.घरच घरं हाय.मोठा रस्ता हा यकच.’ सावरावनं समजावलं.
तो बराच आधी आल्यानं वस्तीचे रस्ते त्याला बऱ्यापैकी महिती झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून वस्ती अस्वस्थ होती.गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते.चोऱ्यामाऱ्या वाढल्या होत्या.मुलींच्या छेडखानीचे प्रकार अचानक वाढले होते.या वस्तीला अशा गोष्टींची सवय नव्हती असे नाही.अशाच वातावरणात पिढ्यानपिढ्या तयार झाल्या होत्या.परंतू आता बाहेरून येणारे गुन्हेगार,अन चोरीच्या नवनवीन तऱ्हा याने वस्ती त्रासली होती.त्यातच बायाबापड्यांची असुरक्षीतता ःइ नावी चिंता भेडसावत होती.शिकलेल्या नव्या तरुणांसाठी ही शरमेची बाब होती.त्यांनी एकी केली. वस्तीच्या छोट्याश्या एकमेव चौकाशी सदानंद,हरिष,राकेश उभे होते. ‘हे फार झालं.सालं काहीतरी करावं लागतं आता.’ ‘गस्त सुरू तं केली आहे नं बे.साले सापडू तं दे, हाणू एकेकाला.लमडीचे,वळून पाह्यचे नाहीत.’ ‘साले बायकांना त्रास देऊन ऱ्हायले बे. चाकू दाखवून दागीने काढून घेत होतेच, आता अंगावर हात टाकून ऱ्हायले. हिंमत वाढली साल्यांची.’ ‘खूप झालं बे.सापडले पाह्यजे आता. ‘जुग्याच्या पानठेल्याकडे कोणी बायकांच्या वेशातले माणसं फिरून ऱ्हायले म्हणे’ तपेश ओरडत आला.सगळे तिकडे धावले. रामश्या,सुपड्या,आणि सोरत्या,भिवालाल बरेच आतपर्यंत गेले होते. बरेच वेळ फिरून कहीही मिळालं नाही.बाया दारच उघडेनात.सगळे विचित्र नजरेनं बघताहेत असा त्यांना आता विश्वास होऊ लागला. ‘इतली वर्सं झाली,इतले गावं फिरलो पन असं कधी वाटलं भाई काऊन तं.’ भिवालाल म्हणाला. ‘मन कसनुसं होतंय पहाटेपासून’ रामशा म्हणाला. ‘नुसती पायपीट चाललीया,काय मिळंना.सावरावनं आपून चांगला भाग निवडला आसल,आपल्याले देल्ल इकडे धाडून...’सोरत्यानं बोलताबोलता भिवालालच्या खांद्याभोवती हात टाकला.सुपड्यानं बीडी काढली.चौघे जुग्याच्या पानठेल्याच्या बाजूला आडोशाला उभे राहिले.बीडी आळीपाळीने प्रत्येकाच्या ओठाची फेरी मारू लागली. ‘ते पाहा,लपून उभे आहे चोट्टे!साड्या घालून काळे धंदे करतात हरामखोर!’ हरिष म्हणाला. ‘अब्बे हेच लोक आहे हाडकेच्या पोरीचा सत्यानाश करणारे.’ ‘काय बोलतो?खरं का काय?अरे अशा माणसांना जिवंत नाही ठेवलं पाहिजे,साले भडवीचे!’
त्या चौघांपाठोपाठ आणखी काही जण येऊन उभे राहिले.सदानंदने त्वेषाने दगड भिरकावला.रामशाने दचकून पाहिलं, ’पळ सोरत्या...काय खरं दिसत नाई,लोकं मारायले.’सुपड्या बोलला. ‘पन आपून काई वंगाळ केलं नाही मंग कायले घाबरायचं.सांगू आपून त्याईले.’रामश्या म्हणाला.तोवर चारपाच गदड अजून आले.भिवालाल म्हणाला,’ ‘चला निंगा इथून.पळा बिगी बिगी..’तो वळून पळू लागला.तिघेही त्याच्या मागे. ‘अब्बे! पळाले साले.पकडा...चोर..चोर.’ ‘मारा साल्यांना, जाऊ देऊ नका.’ हाडकेच्या घरासमोर गर्दी जमली होती.त्याच्या दोन्ही मुलीसोबत कुणीतरी काळे केले होते,अन पांढरी पडलेली प्रेतं नाल्यात सापडली होती.पोलीस पंचनामा करून प्रेतं ताब्यात देऊन गेली होती.कुणीतरी या गर्दीला कळवले.दारासमोर प्रेतं टाकून हाडके धावला.त्याच्या पाठोपाठ त्याची चवताळलेली माणसेही धावली. ‘साल्ले! बायांची अब्रू घेते..’ ‘कातडं सोललं पाहीजे साल्यांचं.’ एकापाठोपाठ एक आवाज येऊ लागले.घराघरातून माणसे बाहेर पडली. पळणाऱ्या तिघांवर प्रत्येकजण हाती येईल ते भिरकावत होता.जमाव कृर होत गेला. चौघेही सैरावैरा धावू लागले.परंतू वस्तीच्या चक्रव्युहात ते पुरते अडकले होते.या गल्लीतून त्या गल्लीत...त्यांना मुख्य रस्ता सापडेना.साड्या घातलेल्या या तिघांना धावणेही कठीण झाले.गोंधळ वाढत गेला अन माणसेही.कुणालाच कुणाचा आवाज ऐकू येईना.मात्र गर्दीतला प्रत्येकजण आपला राग दगडाच्या रुपाने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची धडपड करीत होता.संतापलेल्या कृर जमावासमोर चार प्राणी सैरावैरा धावून प्राण वाचविण्याची केविलवाणी धडपड करीत होते.गयावया करीत होते.परंतू दोक्यात राख घातलेल्या गमावाला त्यांचे कहीही ऐकायचे नव्हते.त्यांनी न्याय हाती घेतला होता.अक्कूयादव प्रकरणाने सगळ्यांची हिम्मत वाढली होती.रक्ताने माखलेले ते प्राणी क्षीण होऊन खाली पडले अन लाठाबुक्क्यांनी वस्तीने आपला असंतोष दाखवला. कुठूनतरी पोलीसला कळले.गाडी आली.जमावावर लाठीचार्ज करून पोलीसांनी गर्दी हटविली.पण तोवर जमावाचे न्यायदानाचे काम पार पडले होते.साडीतले तीन अभागी जीव तडफडून जागीच गतप्राण होऊन पडले.त्यांच्या पिशवीतून रंगरंगोटीचे साहित्य,विग,किंगरी इ.साहित्य अस्ताव्यस्त होऊन रक्तात विखुरले.भिवालालला अत्यवस्थ अवस्थेत पोलीसांनी गाडीत घातले.वस्तीत आत पांढरी पडलेली दोन मुलींची प्रेते पडली होती आणि वस्तीच्या तोंडाशी रक्तात माखलेली नाथजोग्यांची तीन प्रेते अस्ताव्यस्त विखूरली होती. गुंगीत चाललेला भिवालाल फक्त एकच बडबड करीत होता, ‘माघारा मुडद्याले खांदा द्यायले थांबलो हुतो...तीन खांदे कुठं गेले रे माजे?...यकाच खांद्यावर नाथजोग्याईची प्रेतं वाहायचं कुठलं सोंग घेऊ आता गड्यांनो...’ गर्दीतला प्रत्येक मनुष्य नवं सोंग पांघरून उभा होता.

आणि मला तर माझ्या बायकोवर प्रेम करायचंय !



“क्षणोक्षणी स्फोट वाढत होते. काळ्याकुट्ट अस्वल्या ढगांनी आकाशाला आकाशातूनच हद्दपार केलं होतं. चंद्र तर कधीचाच त्यांच्या लोहमुठीत चिरडला गेला होता. आता आकाशात आग ओकणा-या विमानांची नुसती रेलचेल होती. माझ्या आजूबाजूची झाडं कुठे जळत होती, तर कुठे उन्मळून पडली होती. खेळाच्या मैदानासभोवताली प्रेक्षागृह बांधलं गेलं होतं आणि तिथे कमी कपड्यांतल्या बाया नाचवत होते……”

                     नुकतंच लग्न झालं होतं. निवांत सुट्टी टाकून मी नव्या-नवेल्या बायकोसह या टुमदार शहरात आलो होतो. असंख्य छोट्यामोठ्या टेकड्यांवर मिळून वसलेलं हे शहर आणि चहूबाजूला नजर जाईल तिथवर हिरवीगार आणि शिखराला बर्फाच्छादित शिखरं... हॉटेलात सामान टाकून आम्ही ह्या शहरातल्या लोकांसारखेच साध्याच कापडाचे;पण उत्तम कलाकुसरीचे कपडे घालून तयार झालो आणि फिरायला बाहेर पडलो. एकमेकांच्या हातात हात घालून आम्ही भटकत होतो. टेकड्यांचे उतार चढाव लक्षात घेऊन बांधलेले दगडी रस्ते. दोन्ही बाजूला छोटीशी गटारं. गटारं? छे, त्यातून वाहणारं पाणी तर स्वच्छ चमकत होतं! पूर्ण दगडी बांधणीच्या शहरात अनेक जागा मोकळ्या सोडलेल्या. कुठे खेळायला पक्की मैदानं तर कुठे शांतपणे लोळत आकाशाशी प्रश्नोत्तरे करावीत अशा हिरव्यागार बागा. शहराच्या मध्यभागी एक विस्तीर्ण चौक होता. आणि चौकाच्या मध्यभागी एक सुंदर कारंजं! अनेकजण तर कारंज्याबाजूला उभं राहून त्याच्या उडणार्‍या तुषारात सचैल न्हात होते, कुणीतर चक्क ते पाणी पीत ही होते. पण कुठेच गोंधळ नाही अन्‌ गजबज नाही. होती ती निव्वळ निसर्गाशी एकरूप माणसांच्या हालचालीची गाज. चित्रातला देखावा वाटावा असं ते कारंजं पाहून आम्ही दोघंही हरखलोच. आमचे हात हातात नकळत अजूनच घट्ट झाले. अंगठीची बोटावर खूण यावी अशी बांधल्यासारखी बोटं एकमेकांत गुंफली गेली. आणि आजूबाजूच्या बाजारपेठेकडे चक्क दुर्लक्ष करत आम्हीही त्या तुषारांत हरवून गेलो.
पण काही क्षणच... जमीन विचित्र थरथरू लागली. ती थरथर काही क्षणातच टिपेला पोचली. कारंज्यातला मनोरा निखळून वाकडा झाला आणि आकाशात सूर्य असतानाही डोळे दिपवणारा एक प्रचंड प्रकाशाचा पुंजका पलिकडल्या दरीत चमकला. कान करपून गळून पडतील की काय अशी भिती वाटावी,असा उच्च पट्टीतला आवाज आमच्यावर लगोलग येऊन आदळला आणि एक काळाकुट्ट अस्वल्या ढग निरीच्छ डुगडुगत दरीतून आकाशगामी झाला. आता माणसांची निवांत गजबज, गाज; शुद्ध गोंधळ झाली होती. त्रेधा उडाली होती सर्वांचीच पार. ह्या अकल्पित घटनेने शहराचं रुपडं पालटून गेलं होतं. शांतता जाऊन सगळी अनागोंदी माजली होती. बायको खूपच घाबरली होती. अगदी गप्प झाली होती. तिला घेऊन पुन्हा हॉटेलवर निघालो. वाटेत पुन्हा तेच खेळण्यासाठीचं मैदान लागलं तिथे कुणातरी नेत्याची पोस्टर्स लावली गेली होती आणि स्टेज उभारणं चालू होतं. बॅडमिंटनच्या तुटक्या रॅकेटला कुणीतरी झाडावर लटकावून दिली होती. तिचे घड्याळाच्या लंबकाप्रमाणे झोके चालू होते. आम्ही पुढे निघालो. हॉटेलवर आलो खरा पण मला माझी उत्सुकता शांत बसू देईना. बायकोला रूमवर जाऊन आराम करायला सांगितलं आणि मी बाहेर पडलो.
कारंज्याकडे न जाता मी आता दुसरीच दिशा पकडली. इथे लोकांचा फार ओघ नव्हता. स्फोटाचा तो आवाज अजूनही कानात घुमत होता. त्यामुळेच की काय आजूबाजूची अरण्यशांतता डाचत होती. गटारांचं पाणीसुद्धा, उगाचच वाटलं असेल, पण गढूळलेलं दिसलं. आता उतार लागला. त्यावरून धावत खाली उतरलो तर थोडी पसरट समतल जागा होती. इथपासून पुढे रस्ता मातीचाच होता. इथूनच पुढे ती दरी असावी असा मी कयास बांधला. वरून दोनचार विमानं गेली. पुढून दोनचार विमानं आली. आगीचे लोळ एकमेकांवर फेकले. खूप चित्रविचित्र यांत्रिक आवाजांचे आकाशावर ओरखडे ओढत ती कुठेतरी दिसेनाशी झाली. मागे एका टेकडीवर एक उंचसा मनोरा बांधला होता. त्यावर एक जुनी वाटावी अशी एक आकाशदर्शनाची दुर्बिण होती. तिकडूनच बहुधा लहान लहान मुलांचे हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. मी तिकडे पळालो. एका दमात मनोरा चढून गच्चीवर पोचलो. तिथूनच उभ्या उभ्या त्यांचं निरागस हसणं, खिदळणं, खेळणं पाहू लागलो. उदाहरणार्थ कुणी गोरीगोमटी, नाकेली, घार्‍या डोळ्यांची मुलगी बसक्या नाकाच्या, बटबटीत डोळ्यांच्या, काळ्याकुट्ट मुलाच्या खांद्यावर हात टाकून जोडीनं बडबडगीत म्हणत होती. कुणी घरात चिंचपानाची पोळी आणि करवंदांची आमटी करून इवल्याशा ताटल्यांतून सगळ्यांना वाढत होती. त्यांचं असं एकमेकांत, निसर्गात गुंतणं फार लोभस होती. मग मी ही मूल झालो आणि त्यांच्यात जाऊन बसलो. त्या चिंचपानाच्या पोळीतला एक घास तोडून मग तो करवंदाच्या आमटीत बडवून मग बत्तीस वेळा चावून खाण्यात किती किती मजा आहे की काय सांगू!
पुन्हा तेवढ्यात तीच थरथर... मनोरा तुटून पडतो की काय असंच वाटू लागलं. थरथर टिपेला पोचली तेव्हा पुन्हा एकदा तो कान करपवणारा आवाज आमच्यावर येऊन आदळला. मग मात्र माझं पोरपण फार काळ टिकलं नाही. मी सगळ्या मुलांचं कोंडाळं करून त्यांच्याभोवती माझ्या हातांचं कडं केलं. एक काळाकुट्ट अस्वल्या ढग निरीच्छ डुगडुगत दरीतून आकाशगामी होत होता. थोड्या वेळानं ती गोरी मुलगी म्हणाली, "काका एवढे मोठे होऊन तुम्ही घाबरलात? देवकाका मुद्दामूनच फोडतात असे दिवे घातलेले फुगे; आपल्याला घाबरवायला; पण आम्ही नाही घाबरत. आम्ही शूर आणि शहाणी मुले आहोत.". असं म्हणून एक करवंद त्या आंबट चिंबट चिंचपानांसोबत मला दिलं. मी घेतलं नाहीच तर आल्या पावली परत फिरलो. कुणातरी द्रष्ट्या आकाशनिरीक्षकाला तार्‍यांची सैर जिने कधी काळी घडवून आणली असेल त्या दुर्बिणीचा मात्र रद्दी ढीग झाला होता. हिरव्यागार जमिनीवर त्या दूरगामी काचा असंख्य ठिकाणी रुतल्या होत्या. आता असे बारिकसारीक फुगे जवळपास प्रत्येक डोंगरामागून फुटत होते. दरवेळेस शहराबाजूचं अरण्य काळं पडत चाललं होतं. मी झपाट्याने शहराच्या वरच्या भागाकडे निघालो. आता दगडी रस्त्यांमधून भेगा पडत होत्या. वेडेवाकडे निघालेले दगड पायांना काचत होते. मी वर आलो खरा पण त्या कारंज्याकडे जायची मला भितीच वाटली. न जाणो त्या कारंज्याची कशी अवस्था झाली असेल. काही वेळापूर्वी ज्याच्या थुईथुई तुषारांत आम्ही प्रेमालाप करत होतो त्याची उध्वस्त अवस्था माझ्याच्याने नक्कीच बघितली जाणार नव्हती. आजूबाजूच्या अरण्यप्रदेशात जागोजागी वणवे पेटले होते. वणव्यांच्या काळ्याकुट्ट धुराने आकाश काळं पडत चाललं होतं. त्या दिवशीच्या सूर्यास्ताला आकाश रंगीत झालं नाही. फक्त भग्न होत काळं काळं विझत गेलं.
असल्या ह्या घाणेरड्या प्रदूषणाने माझे डोळे चुरचुरायला लागले. च्यायला शांतपणे हनीमूनला एखाद्या टूरिस्ट स्पॉटवर जावं तरी साली हीच गर्दी, हाच गोंधळ आणि हेच प्रदूषण. अचानक मागून घोषणांचे आवाज आले. मागच्या दोन रस्त्यांवरून पांढर्‍या कपड्यांतली आणि सोन्याचांदीत मढलेली अनेक लोकं हातात रंगीबेरंगी झेंडे घेऊन त्यांच्या नेत्यांचा जयजयकार करत येत होती. माझ्यासमोरच्या चौकात दोन्ही मोर्चे एकत्र आले. मोर्च्यातली पुढली सोन्याचांदीत मढलेली माणसं मग अचानक गायब झाली; झेंडे पायदळी तुडवले गेले आणि गटारांतलं आधीच गढूळलेलं पाणी लाल होऊन वाहू लागलं... मी जिवाच्या आकांताने तिकडून पळालो. कुठे पळालो, किती वेळ पळत होतो, कसा पळालो काही कळलं नाही. उडणारा श्वास जमिनीवर आला तसं परिस्थितीचं भान आलं. बारीकशी अंधारी गल्ली होती. कचर्‍याचा सडका वास भरून राहिला होता. आजूबाजूच्या अंधाराचा प्रभाव म्हणून असेल पण इकडे शांतता जाणवत होती. मी थोडा सैलावलो. बायकोच्या आठवणीने एकदम कससंच होऊ लागलं. अंधारात कुठूनतरी तिचा स्पर्श व्हावा असं वाटू लागलं. पण त्या सडक्या वासानं वैतागलो च्यामारी. वाटेत आलेल्या दारूच्या कॅनला लाथ घातली आणि तिथून निघालो. आता समोर अजून एक मनोरा आला. पण ह्या मनोर्‍यावर मात्र खेळणारी लहान मुलं नव्हती. तर होता एक वेडा. मधेच उकिडवा बसे. मधेच उठून नाचे. त्याने इथल्या लोकांसारखेच साधेसुधे ढगळ कपडे घातले होते. पण एक फरक मात्र होता, त्याला कपड्यांवर उत्तम कलाकुसर करवून घ्यायला वेळ मिळाला नव्हता. त्याने दाढी वाढवली होती आणि हिरव्या नोटांचा पटका बांधून त्याचे घाणेरडे उद्योग चालू होते. त्याने दिवे घातलेले फुगे फोडून फोडून समोरच्या डोंगरावरचा सगळा बर्फ वितळवला. मग जेव्हा डोंगराच्या पायथ्याचं गाव बर्फाच्या थंड पाण्यात वाहून गेलं तेव्हा तो जाऊन पुन्हा उकिडवा बसला. ह्या काळवंडलेल्या आकाशाकडे कसली करूणा भाकत होता देव जाणे. अवघ्या काही क्षणात झालेल्या त्या गावाच्या वाताहतीने मी मुळापासून हादरलो. मी हॉटेलच्या दिशेने पळत सुटलो. मला कसंही करून माझ्या बायकोला भेटायचं होतं.
क्षणोक्षणी स्फोट वाढत होते. काळ्याकुट्ट अस्वल्या ढगांनी आकाशाला आकाशातूनच हद्दपार केलं होतं. चंद्र तर कधीचाच त्यांच्या लोहमुठीत चिरडला गेला होता. आता आकाशात आग ओकणा-या विमानांची नुसती रेलचेल होती. माझ्या आजूबाजूची झाडं कुठे जळत होती, तर कुठे उन्मळून पडली होती. खेळाच्या मैदानासभोवताली प्रेक्षागृह बांधलं गेलं होतं आणि तिथे कमी कपड्यांतल्या बाया नाचवत होते.
माझे पाय रक्ताळलेत, कपडे फाटलेत. शुद्ध कधीही हरपेल आता माझी. एका तुटक्या झाडाच्या बुंध्याशी तरी बसावं म्हणतो आता. मगाचचा तो बॅडमिंटन रॅकेटचा लंबक आता थांबलाय. कदाचित कायमचाच? जमीन आता पुन्हा थरथरतेय. ह्यावेळेस जरा जास्तच. अजून एक स्फोट आणि आख्खी पृथ्वीच फेकली जाईल तिच्या परिवलन कक्षेबाहेर. आणि पुन्हा एक कान करपवणारा तीव्र आवाज आणि हा काळाकुट्ट अस्वल्या ढग कारंज्यातून आकाशगामी होतोय. मला बायकोला भेटायचंय..... ..आणि मला तर माझ्या बायकोवर प्रेम करायचंय !
-आल्हाद महाबळ
alhad.mahabal@gmail.com